Saturday, January 30, 2021

झाडे लावा झाडे जगवा !ऑक्सिजन'ची खरी गरज आहे हे कोरोना कालावधीत पाहायला मिळाले - भास्करराव पेरे पाटील


झाडे लावा झाडे जगवा !ऑक्सिजन'ची खरी गरज आहे हे कोरोना कालावधीत पाहायला मिळाले - भास्करराव पेरे पाटील
       
   नारायणगाव(विशेष प्रतिनिधी) दि.३० माणसाला खरी ऑक्सिजनची गरज आहे.
कोरोना महामारी कालावधीत औषधांपेक्षाही ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावण्याची
उदाहरणे आहेत,म्हणून झाडे लावली पाहिजे.
झाडे लावली तर आपल्याला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळू शकतो. असे मत पाटोदा( जि. औरंगाबाद) ग्रामपंचायत'चे माजी सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील  यांनी नारायणगाव 
ग्रामपंचायत व व समविचारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रत व्यक्त केले.
  जुन्नर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत व पंचायत राज याविषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन मुक्ताई समाज मंदिर कार्यालय येथे करण्यात आले होते.
          या वेळी प्रमुख वक्ते भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी,हिवरे तर्फे नारायणगाव,
गुंजळवाडी,खोडद,निमदरी,येडगाव,आर्वी, मांजरवाडी, उदापूर व इतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
                   राजगुरूनगर बँकेचे संचालक किरण मांजरे,समविचारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वारुळे,उपाध्यक्ष आशिष माळवदकर,
सचिव राखी रत्नपारखी,हर्षल मुथ्था, पंचायत समिती सदस्या अर्चनाताई माळवदकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे,
स्थानिक उपसरपंच सौ.सारीकाताई डेरे,आरीफभाई आतार,संतोष दांगट,संतोष पाटे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, माजी सरपंच ज्योतिताई दिवटे,ग्रामपंचायत सदस्या सौ. आश्विनीताई ताजणे,सौ.सुप्रियाताई खैरे,रुपालीताई जाधव,सौ.मनिषाताई मेहेत्रे,सौ.पुष्पाताई आहेर,सौ.कुसुमताई शिरसाठ,सौ.संगीताताई खैरे,सदस्य गणेश पाटे,राजेश बाप्ते,रामदास अभंग ,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
   पेरे पाटील म्हणाले की,प्रत्येक खात्याची तपासणी झाली पाहिजे,तपासणी झाल्यास आढावा घेतल्यास,त्या संस्थेचा ताळेबंद समजू शकतो!करण्यासारखं भरपूर काही आहे!मात्र इच्छाशक्ती पाहिजे असे सुरुवातीला सांगून,ते पूढे म्हणाले की,१)पिण्याचे पाणी स्वच्छ वापरले पाहिजे २) सांडपाणी जमिनीत जिरविले पाहिजे,किंवा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा राबविली पाहिजे ३) मुलांना शिक्षण दिले जावे! ४) झाडे लावली पाहिजे ५) अनाथांना,निराधार व्यक्तींना मोफत जेवण दिले पाहिजे.
             माणसाचे आयुष्य का कमी झाले या विषयावर बोलतांना पेरे पाटील म्हणाले की,माणसाला मोकळा श्वास अर्थात ऑक्सिजन घेण्यासासाठी माणसाकडे वेळ नाही!सर्वत्र घुसमट निर्माण झाली आहे.जमीन आहे तितकीच आहे मात्र लोकसंख्या वाढली आहे.त्यामुळे झाडे लावण्याऐवजी तोडली जात आहेत.झाडे लावा झाडे जगवा!हा मोलाचा संदेश त्यांनी या वेळी दिला!झाडे नसल्याने ऑक्सिजन कमी झाला आहे.झाडे असतील तर ऑक्सिजन वाढेल!पाटोदा या आमच्या गावात रस्त्याने लोकं नारळ तोडून खातात,झाडे लावा आणि त्यातही फळ झाडे लावा! आम्ही आमच्या गावात यंदा आणखी एक प्रयोग केला तो म्हणजे वेल (भोपळा,दोडके,कारले)अशा भाजीपाला साठी वेल लावले!आहेत.
             महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हे सांगितले आहे.संत सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी!असे का ? म्हटले,तुमची इच्छा असेल तर खूप काही करता येऊ शकते असा संदेश संतांची उदाहरणे देऊन पेरे पाटलांनी आपल्या पाऊण तासाच्या भाषणात नारायणगावकरांची माने जिंकली!ग्रामसेवक कपिला गाय आहे!त्यांच्या पोटात तेहतीसकोटी देव आहेत.त्यांच्याशी वाद घालून कामे करण्यापेक्षा त्यांच्याशी जुळवून घेऊन कामे केली पाहिजे! काम करणारालाच नावे ठेवली जातात!परंतू लोकांची नाडी ओळखा आणि कामे करा!आम्ही तेच केले.तुम्हीही करा!असा संदेशही नवनिर्वाचित सदस्यांना त्यांनी दिला!
         पुणे जिल्हा परिषदेचे माजी कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर साहेब यांनी आपल्या कार्यकाळातील ग्रामपंचायतीसाठी कामधेनू योजना राबविली आणि काय फायदा झाला,यावेळी चाळीस ग्रामपंचायतींची निवड केली होती. त्यातून ग्रामस्थांना काय फायदा झाला हे सांगितले!
        सौ.राखी रत्नपारखी यांनी प्रमुख वक्ते भास्करराव पेरे पाटील यांचा परिचय करून दिला!
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष माळवदकर आणि हेमंत कोल्हे यांनी केले!आभार लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी मानले.

Wednesday, January 27, 2021

मेहबूब काझी यांना स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार प्रदान


मेहबूब काझी यांना स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार प्रदान
जयहिंद नॅशनल क्लबच्या 26 व्या वर्धापन दिन प्रसंगी झाले पुरस्कार वितरण 

           नारायणगाव येथील शैक्षणिक कार्यकर्ते मेहबूब काझी यांना जयहिंद  नॅशनल क्लब यांच्या वतीने ' 'शिवनेर भूषण स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार' देण्यात आला.जयहिंद नॅशनल  क्लबच्या 26 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध कवी प्रदीप निफाडकर आणि युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते हा  पुरस्कार प्रदान करण्यात आला अशी माहिती जयहिंद नॅशनल क्लबचे अध्यक्ष अरविंद लंबे यांनी दिली.  
         याप्रसंगी माजी सभापती शिवाजीराव खैरे, जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव 
नेहरकर,जि.प. माजी सदस्या राजश्री बोरकर, शरद बँकेच्या संचालिका पुष्पलता जाधव,  जयहिंद पोलीटेक्निक कॉलेजचे सचिव विजय गुंजाळ,  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर,  युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरज  वाजगे,विक्रम भोर, राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष दीपक वारूळे, जितेंद्र गुंजाळ, देवेंद्र कोराळे, बबन गुळवे, आशिष माळवदकर, संतोष वाजगे,डॉ.मिलिंद कसबे,मोबीन शेख,सादीक आतार,हरिश्चंद्र नरसुडे,शिवाजी घोलप, सुनील ढवळे, राहुल  नवले, शेखर शेटे, अतुल आहेर, शोभना पोखरकर दत्ता जाधव,किरण वाजगें,जयेश कोकणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
          नारायणगाव व परिसरातील केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी तसेच सामाजिक आणि सहकार सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरी साठी जयहिंद समूहाच्या वतीने दिला जाणारा ' शिवनेर भूषण स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्काराचे प्रथम मानकरी म्हणून मेहबूब काझी यांची निवड करण्यात आली.
        तसेच सरपंच सेवा समितीच्या वतीने दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल योगेश बाबू पाटे, जिल्हा नियोजन समितीवर सदस्य पदी नियुक्त झालेले माऊली खंडागळे व  विकास दरेकर, युवारत्न  पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरज वाजगे, आदर्श ग्राम निर्मिती अभियान समिती सदस्य निवडीबद्दल विक्रम भोर यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध कवी व संपादक प्रदीप निफाडकर यांनी '  'यशस्वी जीवनाची आदर्श तत्व ' या विषयी व्याख्यान दिले.
          याप्रसंगी आमित बेनके मेहबूब काझी,  गुलाब नेहरकर,डॉ.वर्षा गुंजाळ,  विकास दरेकर, विक्रम भोर  यांचीही भाषणे झाली.
       कार्यक्रमाचे नियोजन धर्मेंद्र गुंजाळ, अशोक चाळक, छगन पटेल, अमित अडसरे,राहुल खेबडे, श्रीकृष्ण ताम्हाणे, नितीन औटी व सर्व सदस्यांनी केले. 
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद लंबे यांनी केले व सूत्रसंचालन सुनील मेहेर व ज्ञानेश्वर औटी यांनी केले. उपस्थितांचे आभार जितेंद्र गुंजाळ यांनी मानले.

Monday, January 25, 2021

जुन्नर तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २९ जानेवारीला

जुन्नर तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २९ जानेवारीला
  नारायणगाव | जुन्नर तालुक्यातील ५ मार्च २०२० ते ४ मार्च २०२५ मधील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण दि.२९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वा . पासुन जिजामाता सभागृह ( पंचायत समिती जुन्नर ) ता.जुन्नर , जि.पुणे येथे सोडत पद्धतीने काढण्यात येणार आहे.अशी माहिती जुन्नरचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
             जुन्नर तालुक्यातील १४२ ( ४७ आदिवासी व बिगर आदिवासी ९५ क्षेत्रातील ) ग्रामपंचायतीच्या दि .५ मार्च २०२० ते दि.४ मार्च २०२५ या कालावधीसाठी ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत दि.२९ जानेवारी २०२१ रोजी आयोजीत करणेकामी मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्फत आदेशीत करणेत आलेले आहे . प्रस्तुत आरक्षण हे दि .२९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वा . पासुन जिजामाता सभागृह ( पंचायत समिती जुन्नर ) ता.जुन्नर , जि.पुणे येथे सोडत पध्दतीने काढण्यात येणार आहे.
            सदरचे आरक्षण हे दि .५ मार्च २०२० ते दि .४ मार्च २०२५ या कालावधीत यापुढे होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या सरपंच पदाकरीता लागू राहिल .
        सदर आरक्षण सोडतीच्या प्रथम सत्रामध्ये अनुसूचित क्षेत्रातील ४७ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले जाईल . तदनंतर उर्वरित ९५ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काढण्यात येईल .

Saturday, January 23, 2021

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त नारायणगाव शहराच्या सोलर लाईट पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न

नारायणगाव ग्रामपंचायत येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
जयंतीनिमित्त ग्रामपंचायतच्या सोलर लाईट पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न 
नारायणगाव - स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या ग्रामपंचायत पातळीवरील पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्ट्रीट लाईट व ग्रामपंचायत ईमारत १३ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा जि.प.सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, पं.स.सदस्य दिलीप गांजाळे,ग्रामविकास अधिकारी नाईकडे साहेब,लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच सारिका डेरे यांसह ज्येष्ठ नागरिक व  पत्रकारांच्या हस्ते संपन्न झाला.
          नारायणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे ज्येष्ठ शिवसैनिकांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
             यावेळी सरपंच योगेश पाटे  की, या सौरऊर्जा प्रकल्पवार नारायणगाव गावठाण हद्दीतील स्ट्रीट लाईट चालणार असून दर महिन्याला येणार्‍या जवळपास १ लाख रुपये बिलात सुमारे ५० ते ६० टक्के बचत होणार आहे. तर ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे १० ते १५ हजार रुपयांचे बिल देखील वाचणार असुन या बचत झालेल्या पैशाचा सद्पयोग गावच्या विकासासाठी करता येणार असुन ग्रामपंचायत पातळीवरचा हा सर्वात मोठा स्ट्रिटलाईट व इमारत सौरउर्जा प्रकल्प असल्याची माहिती देत स्व.बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
                 यावेळी आशाताई बुचके म्हणाल्या की, नारायणगाव  ग्रामपंचायतच्या माध्यमातुन गॅस शवदाहिनी, पाणी पुरवठा योजना, भव्य गार्डन, पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवरचा सर्वात मोठा सोलर प्रकल्प असे अनेक पथदर्शी प्रकल्प राबवले जात असुन सरपंच योगेश पाटे यांच्या अधिपत्याखाली नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार केला जातोय ही कौतुकाची बाब आहे. यापुढच्याही काळात अधिक चांगल्या पद्धतीने गावचा विकास होईल यात शंका नाही अशा शब्दांत आशाताई यांनी ग्रामपंचायतच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
यानिमित्तानं सरपंच योगेश पाटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच उपसरपंच सारिकाताई डेरे यांना वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात आले.

                 यादरम्यान पत्रकार अमर भागवत यांच्या संकलनातुन ग्रामपंचायतच्या कार्यगौरव दिनदर्शिकेचा व प्रा.अशफाक पटेल यांच्या अखिल मराठी युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उपस्थित म‍ान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 
                 याप्रसंगी अरविंद ब्रम्हे, संतोषनाना खैरे, आशिष माळवदकर, अॅड.राजेंद्र कोल्हे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
                    याकार्यक्रमाला जि.प.सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर साखर कारखान्यचे संचालक संतोषनाना खैरे, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे, अनिल खैरे, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर खळदे, मारुती फुले, रोहिदास तांबे, अरविंद ब्रम्हे, मंगल चिंतामणी, उद्योजक अभय कोठारी, किसन डेरे, अॅड.कुलदिप नलावडे, अॅड.राजेंद्र कोल्हे, पत्रकार सुरेश वाणी, रविंद्र कोल्हे, संजय थोरवे, अतुल कांकरिया, अमर भागवत, मंगेश पाटे, प्रा.अशफाक पटेल, योगेश रायकर, धनंजय माताडे, किशोर वारुळे, जितु आंद्रे यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ शिवसैनिक पत्रकार मित्र,  ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
                  या सोलर लोकार्पण  सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा.अशफाक पटेल यांनी केले. सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे यांनी तर आभार लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी मानले.

Tuesday, January 19, 2021

टाकळी हाजी ता. शिरूर येथील गोळीबार खुन प्रकरणातील दोघे आरोपी ताब्यात : पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी

टाकळी हाजी ता. शिरूर येथील गोळीबार खुन प्रकरणातील दोघे आरोपी ताब्यात : पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी
       
          दिनांक १८/०१/२०२१ रोजी १२.०० वा. चे सुमारास मौजे टाकळी हाजी मळगंगा हॉटेलचे पाठीमागे  वाळु व्यवसायाचे तसेच उसने पैशाचे कारणावरून  स्वप्नील छगन रणसिंग वय २४ रा.टाकळी हाजी ता.शिरूर जि.पुणे याचा आरोपी नामे १)विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे २)आकाश उर्फ बबलु खंडु माशेरे दोघे रा.आमदाबाद ता.शिरुर जि.पुणे व इतर यांनी संगनमत करून होंडा शाईन मोटार सायकलवर येवुन पिस्तुलमधन गोळया झाडुन खुन केला व स्वप्नील सुभाष गावडे यास गोळी मारून जखमी केले. याबाबत मयत स्वप्नील छगन रणसिंग वय २४* याचे पत्नीने दिलेले फिर्यादीवरून शिरुर पो.स्टे. गु.र.नं. ४२/२०२१ भादंवि क .३०२, ३०७, १२०(ब), ३४ आर्म ॲक्ट क.३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
      सदर गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास मा.पोलीस अधीक्षक सो. यांचे आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो यांचे मार्गदर्शनाखाली LCB  पथकाने करून गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन आरोपी नामे - 
१) विजय उर्फ पप्पू उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे वय २५ वर्षे रा.आमदाबाद ता.शिरुर जि.पुणे 
२) आकाश उर्फ बबलू खंडु माशेरे वय २४ वर्षे रा.आमदाबाद, ता.शिरूर, जि.पुणे यांना मौजे शिक्रापूर पुणे-नगर हायवे रोड वरील शिक्रापूर-चाकण चौक येथून ताब्यात घेतलेले आहे .
       सदर दोन्ही आरोपींची वैदयकिय तपासणी करुन त्यांना शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
       सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली  सपोनि. पृथ्वीराज ताटे,
सपोनि. नेताजी गंधारे,पोसई. अमोल गोरे,
सफौ. दत्तात्रय गिरमकर,सफौ. राजेंद्र थोरात,
सफौ. दत्तात्रय जगताप,सफौ. शब्बीर पठाण,
पोहवा. विद्याधर निचित,पोहवा. महेश गायकवाड,पोहवा. निलेश कदम,पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. विक्रम तापकीर,पोहवा. जनार्दन शेळके,पोहवा. काशिनाथ राजापुरे,
पोहवा. प्रमोद नवले,पोना. राजू मोमीन,पोना. मंगेश थिगळे,पोना. दिपक साबळे,पोशि. संदीप वारे,पोशि.अक्षय नवले,पोशि.अक्षय जावळे,
पोशि. प्रसन्न घाडगे यांनी केलेली आहे.

Monday, January 18, 2021

मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या बाल वैज्ञानिकांची गगनभरारी

मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या बाल वैज्ञानिकांची गगनभरारी
लघु उपग्रह बनवून एकाच वेळी कोरनार जागतिक, आशियाई व भारतीय विक्रमावर नाव

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडिया तर्फे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१

'राईस सिटी तुमसर' या नावाने १० विद्यार्थ्यांचा १ गट
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ साठी विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून पहिल्यांदाच जागतिक, आशिया आणि भारतीय विक्रम साधण्याची सुवर्ण संधी मार्टिन ग्रुप तर्फे उपलब्ध करून दिली आहे. भारतातील १००० बाल वैज्ञानिकांद्वारे एकाच वेळी १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजीची जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीत हे विद्यार्थी नक्कीच आपले योगदान देतील. सदर विक्रमावर नाव कोरण्यासाठी महाराष्ट्रातील ३६० बाल वैज्ञानिकांमध्ये मांडवी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब कुटूंबातील प्रज्ञावंत व होतकरू असे इयत्ता ५ वी ते ७ वी च्या ९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून २ दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण सत्र पूर्ण झाले असून १९ जानेवारीला नागपूरच्या सेंट विन्सेन्ट पल्लोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक वर्गास आचल बुराडे (इ. ७ वी), प्रज्वल बुराडे (इ. ५ वी), वेदिका ढबाले (इ. ६ वी), राणु मते (इ. ६ वी), योगेश्वरी ढबाले (इ. ७ वी), समिक्षा ढबाले (इ. ५ वी), खुशबु ढबाले (इ. ७ वी), साक्षी ढबाले (इ. ६ वी), अंशुल टांगले (इ. ५ वी) तसेच तुमसरच्या जनता विद्यालयाची जान्हवी तुमसरे (इ. ७ वी) ह्या दहाही विद्यार्थ्यांना 'राईस सिटी तुमसर' नावाच्या गटाने हजर ठेवण्यासाठी तसेच पालकांना व शाळा प्रशासनास सदर उपक्रमाची संपूर्ण माहिती देवून चर्चा करण्यासाठी १५ जानेवारी रोजी शाळेत सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे कोअर कमिटी मेंबर श्री. दामोधर डहाळे यांनी फाउंडेशनचे उद्दिष्ट, कार्य याविषयी तसेच स्पेस झोन इंडिया व मार्टिन ग्रुप याविषयीसुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. राऊत, शिक्षक दामोधर डहाळे, पालक शिवशंकर ढबाले, भारत ढबाले, दुर्वास टांगले, रामकिसन बुराडे, कैलास मते (पोलीस पाटील) उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

*🚀विशेष*
🛰️स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय?
🛰️त्याचे विविध भाग कुठले? व त्यांचे कार्य कसे चालते?
🛰️हेलियम बलून म्हणजे काय?
🛰️या प्रकारच्या उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवतात?
🛰️या उपग्रहात अभ्यासासाठी कुठले सेंसर?,  कुठले सॉफ्टवेअर वापरले जातात?
🛰️अशी सर्व माहिती व प्रशिक्षण खास महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना मराठी मधूनच देण्यासाठी प्रशिक्षक सज्ज आहेत.
🛰️जगात सर्वात कमी २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम इतक्या वजनाचे १०० उपग्रह बनवून त्यांना ३५ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर हाय अल्टीट्युड सायन्टिफिक बलूनद्वारे दिनांक ७ फेब्रुवारीला तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम् येथून अवकाशात सोडून प्रस्थापित केले जातील.
🛰️उपग्रह एका केस मध्ये फिट केले जाणार असून या केस सोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल.
🛰️तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर  माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील.
🛰️या पेलोड सोबत काही झाडांच्या बीया सुद्धा पाठवण्यात येत आहेत. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल आणि यामुळेच विद्यार्थ्यांची एकाच वेळी जागतिक विक्रम, आशिया विक्रम आणि भारतीय विक्रमात नोंद करुन सहभागी
प्रत्येक विद्यार्थ्यास वरील तिनही प्रमाणपत्रे स्वतंत्ररित्या मिळतील.

विद्यार्थ्यांमध्ये स्पेस संबधी संशोधनाची आवड निर्माण करणारा तसेच त्यांना भविष्यात करियर बनविताना नक्कीच उपयुक्त ठरणारा
हा उपक्रम कलाम कुटुंबियांद्वारे हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम् येथून राबविला जात असून संपूर्ण भारतात डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, स्पेस झोन इंडिया यांच्या मार्गदर्शनात, मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने, मिलिंद चौधरी, ठाणे (जनरल सेक्रेटरी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन) व महाराष्ट्रामध्ये मनिषा ताई चौधरी, नाशिक (महाराष्ट्र राज्य समन्वयक) यांचे नेतृत्वात तसेच दामोधर डहाळे (कोअर कमिटी मेंबर) यांचे सहकार्याने यशस्वी होत आहे.

वारूळवाडी ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये गणपीर बाबा पॅनलचे १० उमेदवार विजयी!भागेश्वर पॅनलच्या ७ उमेदवारांचा विजय

वारूळवाडी ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये गणपीर बाबा पॅनलचे 10 उमेदवार विजयी
भागेश्वर पॅनलच्या सात उमेदवारांचा विजय
नारायणगाव| वारूळवाडी ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये गणपीर बाबा पॅनलचे 10 उमेदवार 
विजयी झाले आहेत. तर भागेश्वर पॅनलच्या सात उमेदवारांचा विजय झाला आहे
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
वाँर्ड क्रमांक एक मध्ये
गणपिरबाबा पॅनल चे राजेंद्र तुकाराम मेहेर यांना 451 विजयी मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी कुणाल दत्तात्रेय वायकर यांना 325 मते मिळाली आहेत.
राजश्री विशाल काळे यांना विजयी 329 मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी मनीषा सोमनाथ काळे यांना 377 मते मिळाली आहे
महिला सर्वसाधारण मध्ये माया सुजित डोंगरे  यांना 391 विजयी मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रमिला निलेश पाटे यांना 382 एवढी मध्ये मिळून त्यांचा पराभव झाला आहे.  यामध्ये माया सुजित डोंगरे या अवघ्या 9 मतांनी विजयी झाल्या आहेत.
वॉर्ड क्रमांक दोनमध्ये
श्याम भाऊ दुधाने यांना 483 विजय मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी रामा मारुती जाधव यांना 317 मते मिळाली आहेत.
सर्वसाधारण गटांमध्ये माजी सरपंच देवेंद्र सुदाम बनकर यांना 478 विजयी मते मिळाली असून राजेंद्र तुकाराम मेहेर यांना 335 मते मिळाली आहेत.
वार्ड क्रमांक दोनमध्ये वैशाली महेश मेहेर यांना 507 विजयी मते मिळाली असून मीना बनकर यांना 306 मते मिळाली आहेत.
वार्ड क्रमांक 3 मध्ये प्रकाश भालेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.
 शुभांगी शाम कानडे यांना 322 विजयी मते मिळाली असून मीना संतोष वारुळे यांना 293 मते मिळाली आहेत
वार्ड क्रमांक 4 मध्ये
आत्माराम दत्तात्रेय संते यांना 507 एवढी विजयी मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी गुंजाळ नितीन यांना 448 मते मिळाली आहेत. याच वाँर्ड मध्ये महिला मध्ये ज्योती साईनाथ संते यांना 587 मते मिळाली असून त्या विजयी झाल्या आहेत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सुभद्रा बटवाल यांना 372 मते मिळाली आहेत.
   किरण महादेव अल्लाट यांना 515 विजयी मते मिळाली असून आदम अब्दुल कादर कुरेशी यांना 432 मते मिळाली आहेत.
क्रमांक पाचमध्ये विपुल अरुण फुलसुंदर 460 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे.  त्यांचे प्रतिस्पर्धी विनायक सुधीर भुजबळ यांना 540 विजयी मते मिळाली आहेत.
रेखा विकास फुलसुंदर यांना 534 विजयी मते मिळाली असून माजी सरपंच ज्योत्स्ना फूलसुंदर यांना 458 मते मिळाली आहेत.
सोनल संदीप अडसरे यांना 546 विजयी मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी सविता पोपट अडअरे यांना 446 मते मिळाली आहेत.
वाँर्ड क्रमांक सहामध्ये
माजी सरपंच जंगल कोल्हे 442 मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी सतेज भुजबळ यांना 226 मिळाले आहे
संगिता दत्तात्रय काळे यांना 656  विजयी मते तर कुंदा भीमदेव काळे यांना 499 मते मिळाली आहेत.
 स्नेहल अतुल कांकरिया 754 मते मिळून विजयी झाल्या असून रजनी राजेंद्र गायकर यांना 410 मते मिळाली आहेत.

या निवडणुकीमध्ये गणपीरबाबा ग्रामविकास पॅनलच्या बिनविरोध एका विजयी उमेदवारासह एकूण  10 उमेदवार विजयी होऊन गणपीर बाबा पॅनलने निर्णायक सत्ता मिळवली आहे.
भागेश्वर पॅनलचे उमेदवार माजी सरपंच देवेंद्र बनकर तसेच माजी सरपंच आत्माराम संते यांसह 7 उमेदवार निवडून आले आहेत.
          या निवडणुकीमध्ये माजी सरपंच ज्योत्स्ना सुरेश फुलसुंदर तसेच  बाजार समितीचे संचालक व विद्यमान सदस्य विपुल फुलसुंदर यांचा पराभव झाला असून भागेश्वर पॅनलचे प्रमुख प्रकाश मामा पाटे यांच्या सुनबाई प्रमिला पाटे यांचा अवघ्या 9 मतांनी पराभव झाला आहे

Monday, January 11, 2021

घोडेकर हल्ल्यातील मुख्य सुत्रधारा सह सुपारी घेणारा कुविख्यात गुंड व हल्लेखोर 3 दिवसात गजाआड

फोटो मजकूर :नारायणगाव या ठिकाणी झालेल्या खूनी हल्ल्यातील पकडण्यात आलेले आरोपी सोबत पोलीस अधिकारी डी के गुंड व तपासी पोलीस कर्मचारी
नारायणगाव येथील कोल्हे मळा चौकात संग्राम घोडेकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील हल्लेखोर व सुपारी घेणा-रा कुविख्यात गुंड गणेश रामचंद्र नाणेकर यांस नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
                          या घटनेतील मुख्य आरोपी चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे हा पोलिसांच्या ताब्यात असून ह्या प्रकरणात सुपारी घेणारा गणेश नाणेकर ,रा .नाणेकर वाडी, चाकण,
अजय उर्फ सोन्या राठोड, वय २३,रा १४ न ,तसेच खबऱ्या संदीप बाळशीराम पवार वय २०,रा पिंपळवंडी ता जुन्नर,व दोन अल्पवयीन हल्लेखोर यांस पोलिसांनी चाकण येथून ताब्यात घेतले असून दुसरा सूत्रधार प्रशांत माने फरार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ जानेवारी रोजी संग्राम घोडेकर याच्यावर हल्ला करून फरार झालेले दोन अल्पवयीन गुन्हेगार व अजय उर्फ सोन्या राठोड हा अलिबाग या ठिकाणी वास्तव्यास होते या घटनेतील दुसरा सूत्रधार प्रशांत माने व सुपारी किंग गणेश नाणेकर या दोघांची पूर्वीची मैत्री होती त्यांनी शेखर कोऱ्हाळे यांच्याबरोबर डिसेंबर २०२० मध्ये या हल्ल्याबाबत ची आखणी केली होती या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा वापर केल्यावर जामीन लवकर होऊन मुलांना सोडवता येईल म्हणून त्यांनी त्या घटनेत अल्पवयीन मुलांचा वापर करायचा ठरवला त्यानुसार  गणेश नाणेकर याने सुपारी घेऊन ही जबाबदारी सोन्या राठोडवर सोपवली गणेश नाणेकर यावर विविध पोलीस ठाण्यात शरीराला अपाय करण्याबाबतचे व इतर गंभीर गुन्हे तर  हल्लेखोर अजय उर्फ सोन्या राठोड याच्यावर चोरी,अपहरण करून खून करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ७ जानेवारी रोजी हल्ला करण्यापूर्वी या गुन्ह्यातील संदीप पवार हा संग्राम घोडेकर यांच्यावर पाळत ठेवून होता त्यानुसार पवार यांनी अजय उर्फ सोन्या राठोडला संग्राम घोडेकर यांच्या हालचाली ची माहिती देऊन सोन्या राठोड याने दोन अल्पवयीन मुलांना बरोबर घेऊन संग्राम घोडेकर यांच्यावर कोल्हे मळा येथे कोयत्याने  हल्ला चढवला या हल्ल्यानंतर नारायणगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नारायणगाव पोलिसांनी या घटनेनंतर मुख्य सूत्रधार चंद्रशेखर को-हाळे यास अवघ्या सहा तासाच्या आत ताब्यात घेतले व पुढील गुन्हेगार लवकरच शोधून काढून असा शब्द सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी ग्रामस्थांना दिला होता त्यानुसार तीन दिवसाच्या आत यातील हल्लेखोर व सुपारी घेणाऱ्यास नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नारायणगाव ग्रामस्थांमधून या अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
           सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पो उप नि गुलाब हिंगे,पोलीस नाईक दिनेश साबळे,पालवे,पोलीस शिपाई सचिन कोबल,शैलेश वाघमारे,शाम जायभाय,संतोष साळुंखे,योगेश गारगोटे यांच्या पथकाने केली  केली.


Sunday, January 10, 2021

गणपीरबाबा ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडून पॅनल प्रमुख संजयशेठ वारुळे यांसह उमेदवार मतदारांच्या भेटीला.

           
           नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथील ग्रामपंयत निवडणुकीचे पडघम जोरदारपणे उमटु लागल्याचे दिसुन येत आहे.या निमित्ताने सन 2021 ते 025 करिता होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ येथील सामाजीक कार्यकर्ते श्री. संजयशेठ वारुळे व त्यांच्या सहका-या सोबत विविध ठिकाणातील ( वार्ड क्रमांक 1 ते 6 ) मधुन फोडण्यात आला. यावेळी गणपीर बाबा पॅनेलच्या विविध उमेदवारांनी प्रत्येक प्रभागातुन शक्ती प्रदर्शनार्थ  मतदारांच्या घरोघर भेटी घेण्यासाठी संपर्क साधला.गणपीर बाबा पॅनेलने गेल्या पंचवार्षीक ग्रामपंचायत कारकिर्दीच्या माध्यमातुन अनेक विकास कामे केली हे आजही येथील मतदार सांगताना विसरत नाही.या मध्ये मुख्यत: नुतन ग्राम संसद भवन ,नळपाणी पुरवठा योजना,रस्ते,बंदिस्त गटार योजना,विज प्रश्न,वयोवृध्द ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना - नाणी पार्क, बालोद्यान व व्यायाम शाळा उपकरणे उपक्रम, शाळा कॉलेज व खेडो पाड्याकडे जाणारे आणि गल्ली बोलातुन जाणा-या सिमेंट काॅंक्रेटीकरणाचे रस्ते, नारायणगाव व वारुळवाडीस जोडणारा पुल परिसराचे सुशोभीकरणाचा समावेश असणे हि त्यांच्या जमेची बाजु असल्याचे मतदार व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.एकंदरीत या निवडणुकीत गणपीर बाबा पॅनेलचे सर्व उमेदवार भरगोस मोठ्या मतांनी विजयी होतील असे ग्राहक समाचार विशेष प्रतिनिधीनी घेतलेल्या आढाव्यातुन समजते.

Saturday, January 9, 2021

बंद घरे फोडून चोऱ्या करणाऱ्या रेकॉर्ड वरील आरोपीस नारायणगाव येथे स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक

                नारायणगाव : पुणे ग्रामीणचे
 पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी
 जिल्ह्यात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार खेड जुन्नर भागात रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा तपास करत असताना बंद घरे फोडून चोऱ्या करणाऱ्या रेकॉर्ड वरील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
              पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
        सागर मनोज विटकर वय 26 रा.नारायणगाव वाजगे आळी हा नारायणगाव बस स्टॅन्ड या ठिकाणी संशयित रित्या फिरताना आठळला.त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवा उडविची उत्तरे दिली म्हणून त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या पॅन्ट च्या खिश्या मध्ये 3 मोबाइलल मिळून आले त्या बाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता ते मोबाइलल त्याने वाजगे आळी नारायणगाव येथून चोरल्याचे सांगितले.
त्याची अधिक कसून चौकशी केली असता त्याने त्या घरातून एक सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली.
            सदर बाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.381/2020 भा.द.वि 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.तसेच यापूर्वी या आरोपीवर 
1) जुन्नर पोस्टे गु.र.नं 91/2014 भा.द.वी. कलम 395 
2) जुन्नर पोस्टे गु.र.नं 82/2014 भा.द.वी. कलम 392
3) घोडेगाव पोस्टे गु.र.नं.49/2014 भा.द. वि कलम 395  पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.
         सदर आरोपीची वैदकीय तपासणी करून नारायणगाव पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
         सदर ची कामगिरी मा पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख यांच्या सुचने नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नेताजी गंधारे,
पोहवा.विक्रम तापकीर,पोना.दीपक साबळे,
पोशी. संदीप वारे,पोशी. अक्षय नवले,पोशी. निलेश सुपेकर,पोहवा.हनुमंत पासलकर यांनी केली आहे.

Tuesday, January 5, 2021

नारायणगाव येथे ३५०० किलो वजनाचे गोमांस वाहतूक करताना दोघेजण ताब्यात

नारायणगाव येथे ३५०० किलो वजनाचे गोमांस वाहतूक करताना दोघेजण ताब्यात
नारायणगाव : दि.०५/०१/२०२१ रोजी पहाटे ०३:३० वा.च्या सुमारास मौजे वारुळवाडी गावच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपच्या समोर नाशिक-पुणे रोड जवळ टेम्पो मधून ३५००किलो वजनाचे गोमांस वाहतूक करताना दोन जण फिर्यादी व साक्षीदारांना मिळून आले आहेत. दोन्ही आरोपींना अटक करून दोन दिवस पोलिस कोठडी मिळालेली आहे.अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डि. के. गुंड यांनी दिली.
             याबाबतची फिर्याद शिवशंकर 
राजेंद्र स्वामी वय २७ वर्ष धंदा समाजसेवा रा. 1177 /33, रेव्हेन्यु कॉलनी शिवाजी नगर पुणे 41 10 05 यांनी दिली आहे.
              यातील आरोपी1)सुफियान
 शब्‍बीर अन्सारी वय 33 वर्ष,धंदा ड्रायव्हर, राहणार शिळफाटा मुंब्रा,ठाणे जिल्हा 
2)अश्फाक मोहम्मद हनीफ आतार  वय 40 वर्ष,धंदा मजुरी, राहणार मंगळवार पेठ जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या दोघांना अटक असून दोन दिवस पोलिस कोठडी मिळालेली आहे.
                पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.०५/०१/२०२१ रोजी पहाटे ०३:३० वा.च्या सुमारास मौजे वारुळवाडी गावच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपच्या समोर नाशिक-पुणे रोडवर सदर आरोपिंनी त्यांच्या ताब्यातील आयशर कंपनी टेम्पो गाडी नंबर एम एच१४ एच जी २४०९ यामध्ये गाई व बैलांचे कापलेले मांस अंदाजे वजन ३५०० किलो किमत ५,२५,००० रुपये किमतीचे त्यांच्याकडे पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना गोवंश कापणे व वाहतूक करणे बंदी असताना वरील नमूद वाहनांमधून वाहतूक करताना फिर्यादी व साक्षीदारांना मिळून आले आहेत म्हणून वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून गु.र.नं व कलम:- ०२/२०२१ पशु परीक्षण अधिनियम १९४८ कलम५(क),महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ चे कलम ९(अ), (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.