ग्राहक समाचार news & web chanal
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
नारायणगाव :दि.२६ जानेवारी २०२०
ब्रिटिश राजवटीत स्वातंत्र्यासाठी भारतात अनेक आंदोलने झाली.लाखो लोकांनी यात भाग घेतला.लाठी, गोळ्या झेलल्या.वंदे मातरम चा घोष करत निर्भयपणे फाशीचा दोर स्वीकारला.ऑगस्ट महिन्यातस्वातंत्र्य मिळाले. भारत छोडो चळवळही चळवळ ही याच महिन्यातली.संपूर्ण ऑगस्ट महिन्यावर स्वातंत्र्य चळवळीची छाप आहे.चळवळीत अनेक कवींनी देशभक्तीपर गीते गाऊन समाज जागृती करण्याचे काम केले. अगदी अल्पशिक्षित शेतकरी काम करणाऱ्या पासून कुसुमाग्रजांसारख्या प्रतिभावान दिगग्ज कवीं पर्यंत सर्वांनीच क्रांतीचा जयजयकार केला. यातील अनेक गीते कालौघात नष्ट झाली कारण कोणी ती लिहून ठेवली नव्हती की छापली नव्हती.परंतु लोकांच्या कंठात आणि अंतकरणात मात्र ती घट्ट स्थान मिळवून बसली होती.
नारायणगाव येथील कै. हरिभाऊ (बाबू मामा) मल्हारी शेटे ब्रिटिश राजवटीत जाचक महसूल कराच्या वरवंट्याखाली कुटुंब भरडले गेले होते.भूमिहीन झालेल्या बाबू मामांनी अखेर मुंबईची वाट धरली मुंबई सेंट्रल स्थानकांवर वर्षानुवर्ष हमाली केली व झाल्यावर गावी परतले बाबू मामांनी किशोरावस्थेत ४२ सालचे आंदोलन पाहिले होते. त्यांच्या लहानशा खेड्यात क्रांतीची गीते इतर मुलांबरोबर गायली होती असेच एक गीत क्रांती देवीचा पाळणा कुणी अनामिक कवीने रचलेला कुठेही न लिहून ठेवलेला ना छापलेला पण वयाच्या ९३ वर्षे वयाच्या बाबूूमामांच्या स्मरणात घट्ट कोरलेला होता.
दि १८ जानेवारी २०२० रोजी बाबू मामांना देवाज्ञा झाली त्यांच्या आठवणीतील एक पाळणा गीत त्यांना श्रद्धांजली रूपाने ग्राहक समाचार मध्ये प्रसिद्ध करत आहोत.
असा आहे क्रांती देवीचा पाळणा -
८ऑगस्ट १९४२ सालात
चले जावचा ठराव मुंबई शहरात
पुढारी सारे टाकले तुरुंगात
आम्हाला नाही कळले खेड्यात
जो बाळा जो जो रे जो ||
ब्रिटिश सरकारने कावा दाविला
अटक केली गांधीबाबाला
तेव्हाच क्रांती आली जन्माला
जो बाळा जो जो रे जो ||
पहिल्या दिवशी चा पहिला प्रकार
ट्रामागाड्यांचा केला चक्काचूर
बंदोबस्ताला गोरे लष्कर
जो बाळा जो जो रे जो ||
दुसऱ्या दिवशी दुसरा निर्धार
ऑगस्ट क्रांतीचे नेते शूर
जयप्रकाश नारायण धावले म्होरं
क्रांती करण्याला व्हावं तैयार
जो बाळा जो जो रे जो ||
तिसऱ्या दिवशी तिसरा डाव
क्रांतिवीर बोलती अच्युतराव
लहान थोरांनी खेड्यात जावं
क्रांती देवीला संग न्यावं
जो बाळा जो जो रे जो ||
चवथ्या दिवशी चौथा प्रकार
क्रांतिवीरांनी केला विचार
राम मनोहर लोहिया डॉक्टर
रेडिओवरून बोलती सारं
जो बाळा जो जो रे जो ||
पाचव्या दिवशी पाचवी होई
अरुणा असफअली धावुनी येई
साऱ्या देशाला संदेश देई
क्रांती देवीची पूजा करावी
जो बाळा जो जो रे जो ||
सहाव्या दिवशी सहावा करा
खांब पाडून तोडा विजेचा तारा
आगगाड्या तुम्ही बंदची करा
गोरा साहेब तेथेची धरा
जो बाळा जो जो रे जो ||
सातव्या दिवशी सातवा धडा
कोर्टकचेऱ्यावर मोर्चाची काढा
पोस्ट ऑफिसे बंदची पाडा
नोकरशाहीनो नोकऱ्या सोडा
जो बाळा जो जो रे जो ||
आठव्या दिवशी अवतार आठवा
नाना पाटीलांना लवकर भेटवा
गोरगरिबांचा अन्याय मिटवा
गुंड लोकांना माघारी हटवा
जो बाळा जो जो रे जो ||
नवव्या दिवशी नवरत्न हार
नाना पाटील क्रांतीचे विर
भूमिगत होऊनी सांगती सारं
स्थापन केले पत्री सरकार
जो बाळा जो जो रे जो ||
दहाव्या दिवशी दहावा गण
सानेगुरुजी माते प्रमाण
तिरंगी झेंडा फडकवी निशाण
जो बाळा जो जो रे जो ||
अकराव्या दिवशी अकरावा झाला सुभाषबाबूंनी मंत्र ही दिला
आझाद सैनिकांनो जय हिंद बोला
एकजुटीने दिल्लीला चला
जो बाळा जो जो रे जो ||
बाराव्या दिवशी बारावा रंग
लहानथोर झाले क्रांतीत दंग
स्वातंत्र्यलढ्याचे वाजले शिंग
इंग्रजांचे राज्य झाले दुभंग
जो बाळा जो जो रे जो ||
क्रांती जन्मली मुंबई शहरात
आनंद झाला हिंदुस्थानात
पाचवी पुजली बिहार देशात
पाळणा बांधीला सातारा जिल्ह्यात
जो बाळा जो जो रे जो ||
माय बहिणींनो विनंती ऐका
राष्ट्रीय पाळणा येथून घोका
इंग्रजी सत्तेचा ओळखा धोका
कवीची विनंती आव नका
जो बाळा जो जो रे जो ||
(संग्राहक - मंगला नायडू)
No comments:
Post a Comment