∆ केंद्र सरकारच्या विरोधात नायब तहसिलदार यांना निवेदन देताना सत्यशिल शेरकर, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
( शिरोली बु.) - केंद्र सरकारने लोकसभा व राज्य सभेमध्ये शेतकरी (सक्षमीकरण आणि सरंक्षण) मूल्य आश्वासन करार आणि कृषी सेवा करार विधेयक २०२० आणि कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२० मंजूर केले आहे. तसेच केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यात ही बदल केलेला आहे.
सदर कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार जुन्नर तालुका काँग्रेस कमिटीने सदर कायद्याच्या विरोधात जुन्नरचे तहसीलदार यांना निवेदन देऊन नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी निवेदन स्विकारले आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी तथा विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, या कायद्यामुळे बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि शेतीमध्ये अपार कष्ट करीत असलेल्या बळीराजाला हद्दपार करतील अशी भिती सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे. केंद्र सरकारने केलेले कायदे हे शेतकरी, कामगार विरोधी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सदर कायद्यात तात्काळ बदल करून शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करावेत.
यावेळी तालुकाध्यक्ष अशोक घोलप, सुरेश गडगे, तबाजी शिंदे, कुंडलिक शिंदे, प्रकाश जाधव, युवक काँग्रेस अध्यक्ष अंकुश खंडागळे, उपाध्यक्ष राहुल जाधव, आनंद औटी, भानुदास पानसरे, मार्तंड मांडे, राजेंद्र शेळके, संदीप शिंदे व काँग्रेस पक्षाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment